पाठ ८
देवाने वाईट गोष्टी आणि दुःख का राहू दिलं?
१. वाईट गोष्टींची सुरुवात कशी झाली?
देवाने आजपर्यंत मानवांना राज्य करू दिल्यामुळे हे सिद्ध झालं आहे, की ते कधीही मानवजातीच्या समस्या सोडवू शकत नाहीत
सैतान पहिल्यांदा खोटं बोलला, तेव्हापासून पृथ्वीवर वाईट गोष्टींची सुरुवात झाली. सैतान मुळात एक परिपूर्ण स्वर्गदूत होता. पण “तो सत्यात टिकून राहिला नाही.” (योहान ८:४४) जी उपासना फक्त देवाला मिळाली पाहिजे, ती आपल्याला मिळावी अशी इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. आणि म्हणून सैतानाने पहिली स्त्री हव्वा हिच्याशी खोटं बोलून तिला देवाचं ऐकण्याऐवजी आपल्या म्हणण्याप्रमाणे वागायला लावलं. आणि आदामनेही देवाची आज्ञा मोडून तिला साथ दिली. आदामच्या या निर्णयामुळे जगात दुःख आणि मरण आलं.—उत्पत्ती ३:१-६, १९ वाचा.
सैतानाने जेव्हा देवाची आज्ञा मोडायची कल्पना हव्वाच्या मनात घातली, तेव्हा खरंतर त्याने यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराविरुद्ध बंड केलं. मानवजातीतल्या बहुतेक जणांनी सैतानाला साथ दिली. त्यांनीही देवाला आपला शासक म्हणून नाकारलं. अशा प्रकारे सैतान या “जगाचा अधिकारी” बनला.—योहान १४:३०; १ योहान ५:१९ वाचा.
२. देवाच्या निर्मितीत काही खोट होती का?
नाही. देवाची सगळी कामं अगदी परिपूर्ण असतात. देवाने निर्माण केलेले मानव आणि स्वर्गदूत त्याच्या आज्ञा अगदी पूर्णपणे पाळू शकत होते. (अनुवाद ३२:४, ५) देवाने आपल्याला चांगली कामं करावीत की वाईट, हे निवडायचं स्वातंत्र्य दिलं आहे. आणि जेव्हा आपण चांगली कामं करायचं निवडतो, तेव्हा देवावर आपलं प्रेम आहे हे आपण दाखवत असतो.—याकोब १:१३-१५; १ योहान ५:३ वाचा.
३. देवाने आतापर्यंत दुःख का राहू दिलं आहे?
सैतानाने आणि पहिल्या मानवी जोडप्याने यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराविरुद्ध बंड केलं, तरी यहोवाने त्यांचा लगेच नाश केला नाही. का बरं? कारण त्याला हे दाखवून द्यायचं होतं, की जर मानवांनी त्याच्या मदतीशिवाय राज्य करायचा प्रयत्न केला, तर ते कधीही आनंदी राहू शकत नाहीत. (उपदेशक ७:२९; ८:९) आणि मानवी इतिहासाच्या मागच्या ६,००० वर्षांदरम्यान ही गोष्ट अगदी खरी असल्याचं सिद्ध झालं आहे. आजपर्यंत कोणताही मानवी शासक युद्ध, गुन्हेगारी, अन्याय आणि रोगराई पूर्णपणे काढून टाकू शकलेला नाही.—यिर्मया १०:२३; रोमकर ९:१७ वाचा.
याच्या अगदी उलट, जे लोक देवाचं शासन स्वीकारतात त्यांचं नेहमी भलं होतं. (यशया ४८:१७, १८) लवकरच यहोवा सगळ्या मानवी सरकारांचा नाश करेल. आणि जे लोक देवाला आपला शासक म्हणून स्वीकारतात, फक्त तेच या पृथ्वीवर राहतील.—यशया ११:९.—दानीएल २:४४ वाचा.
देवाने दुःख का राहू दिलं? हा व्हिडिओ पाहा
४. देवाने आजपर्यंत धीर धरल्यामुळे आपल्याला कोणती संधी मिळाली आहे?
सैतानाचा असा दावा आहे, की लोक प्रेमामुळे नाही तर स्वार्थासाठी यहोवाची सेवा करतात. पण त्याचा हा दावा खोटा आहे, हे आपण सिद्ध करून दाखवू शकतो. देवाने आजपर्यंत धीर धरल्यामुळे आपल्या सगळ्यांना एक संधी मिळाली आहे. आपल्याला माणसाच्या शासनाखाली राहायचं आहे, की देवाच्या शासनाखाली राहायचं आहे, हे दाखवून देण्याची संधी आज आपल्याजवळ आहे. आणि आपण जीवनात जे निर्णय घेतो त्यांवरून आपण हे दाखवू शकतो.—ईयोब १:८-१२; नीतिवचनं २७:११ वाचा.
५. देवाला आपला शासक म्हणून स्वीकारण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?
आपण देवाचं शासन स्वीकारतो की नाही, हे आपल्या निर्णयांवरून दिसून येतं
देवाला आपला शासक म्हणून स्वीकारण्यासाठी आपण त्याचं वचन बायबल यातून खरी उपासना कशी करायची हे जाणून घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याची उपासना केली पाहिजे. (योहान ४:२३) आणि आपण सैतानाचं शासन नाकारतो हे दाखवण्यासाठी, आपण येशूप्रमाणेच राजकारण आणि युद्ध यात कोणताही सहभाग घेऊ नये.—योहान १७:१४ वाचा.
सैतान लोकांना अनैतिक आणि इतर वाईट गोष्टी करण्याचं उत्तेजन देतो. आणि जेव्हा आपण या गोष्टी करायला नकार देतो, तेव्हा आपले काही मित्र आणि नातेवाईक आपली टिंगल करतील किंवा आपला विरोधही करतील. (१ पेत्र ४:३, ४) अशा वेळेस आपल्याला निवड करावी लागेल. आपण देवावर प्रेम करणाऱ्या लोकांसोबत राहायचं निवडू का? आपण देवाच्या प्रेमळ आणि सुज्ञ नियमांप्रमाणे वागायचं निवडू का? जर आपण असं केलं, तर सैतान खोटा आहे, हे आपण सिद्ध करू. कारण सैतानाने असा दावा केला आहे, की एखाद्यावर दबाव आला तर तो कधीच देवाच्या इच्छेप्रमाणे वागणार नाही.—१ करिंथकर ६:९, १०; १५:३३ वाचा.
देवाचं मानवांवर प्रेम आहे. म्हणून आपण खातरीने म्हणू शकतो की देव वाईट गोष्टींचा आणि दुःखांचा नक्की अंत करेल. आणि जे लोक या गोष्टीवर विश्वास ठेवतात, ते कायम या पृथ्वीवर आनंदाने राहतील.—योहान ३:१६ वाचा.