अध्याय ५८
भाकऱ्या व खमीर
दकापलीसमध्ये येशूकडे लोकांचे थवेच्या थवे आले आहेत. बहुतेक यहुद्देत्तरांच्या या प्रांतात, त्याचे भाषण ऐकण्यासाठी व आपली दुखणी बरी करून घेण्यासाठी अनेक जण दूरवरुन आले आहेत. त्यांनी आपणाबरोबर मोठाली टोपली आणली आहेत. यहुद्देत्तर प्रांतातून प्रवास करताना अन्नसामग्री नेण्यासाठी ती वापरण्याचा त्यांचा रिवाज आहे.
परंतु काही वेळाने येशू त्याच्या शिष्यांना बोलावून म्हणतोः “मला या लोकांचा कळवळा येतो. कारण आज तीन दिवस ते माझ्या बरोबर आहेत व त्यांच्याजवळ खावयाला काही नाही. मी त्यांना उपाशी घरी लावून दिले तर ते वाटेने कासावीस होतील. त्यातील कित्येक तर दुरून आलेले आहेत.”
शिष्य म्हणतातः “येथे अरण्यात हे तृप्त होतील इतक्या भाकरी कोठून आणाव्या?”
येशू विचारतोः “तुम्हाजवळ किती भाकरी आहेत?”
ते म्हणतातः “सात व काही लहान मासे.”
लोकसमुदायाला जमिनीवर बसायला सांगून येशू त्या भाकरी व मासे घेतो, देवाची प्रार्थना करतो, त्या मोडून शिष्यांना देऊ लागतो. शिष्य लोकसमुदायाला देतात व ते सर्व तृप्त होतात. त्यानंतर उरलेले अन्न गोळा केले जाते तेव्हा जवळपास ४,००० माणसे व शिवाय स्त्रिया व मुले जेवली असली तरी सात टोपल्या भरतात!
येशू लोकसमुदायाला निरोप देतो. त्याच्या शिष्यांबरोबर नावेत चढतो व गालील समुद्राच्या पश्चिम किनाऱ्याकडे येतो. तेथे सदुकी धर्म-संप्रदायाच्या लोकांसह आलेले परुशी येशूची परीक्षा पाहण्यासाठी आकाशातून एखादे चिन्ह दाखवण्यास त्याला सांगतात.
आपली परीक्षा पाहण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची जाणीव असल्याने येशू उत्तर देतोः “तुम्ही संध्याकाळी म्हणताः ‘उजाड होईल, कारण आभाळ तांबूस आहे.’ आणि तुम्ही सकाळी म्हणताः ‘आज झड लागेल, कारण आभाळ तांबूस व गडद आहे.’ तुम्हाला आभाळाचे स्वरुप ओळखता येते. पण काळाची लक्षणे तुम्हाला ओळखता येत नाहीत.”
तेव्हा येशू त्यांना दुष्ट व व्यभिचारी पिढी संबोधतो व मागे परुशांना सांगितले तसा इशारा देतो की, योनाच्या चिन्हावाचून दुसरे चिन्ह त्यांना दिले जाणार नाही. तेथून निघून तो व त्याचे शिष्य नावेत बसून गालील समुद्राच्या ईशान्येला असलेल्या बेथेसैदाकडे रवाना होतात. वाटेत शिष्यांच्या लक्षात येते की, ते भाकरी बरोबर घ्यायचे विसरले असून त्यांच्यापाशी एकच भाकरी आहे.
परुशी व हेरोदाच्या सदूकी समर्थकांशी नुकतीच झालेली भेट लक्षात घेऊन येशू त्यांना ताकीद देतोः “संभाळा, परुशांचे खमीर व हेरोदाचे खमीर ह्यांविषयी जपून राहा.” खमीराचा उल्लेख ऐकून शिष्यांना वाटते की, ते भाकरी आणायला विसरले त्याबद्दल येशू बोलत आहे. म्हणून ते आपसात त्या गोष्टीबद्दल वाद घालू लागतात. त्यांचा गैरसमज लक्षात येऊन येशू म्हणतोः “तुमच्याजवळ भाकरी नाहीत ह्याविषयी चर्चा का करता?”
नुकत्याच, येशूने हजारो लोकांना भाकरी पुरवल्या होत्या. हा शेवटला चमत्कार त्याने बहुधा एक-दोन दिवसांपूर्वीच केला होता. खरोखरच्या भाकऱ्यांच्या कमतरतेबद्दल त्याला चिंता वाटत नसल्याचे त्यांना कळायला हवे होते. तो त्यांना आठवण करून देतोः “तुम्हाला आठवत नाही काय? मी पाच हजार लोकांना पाच भाकरी मोडून वाटून दिल्या तेव्हा तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या भरून घेतल्या?”
“बारा,” ते उत्तर देतात.
“तसेच चार हजारांसाठी सात भाकरी मोडल्या तेव्हा तुम्ही किती पाट्या तुकडे भरून घेतले?”
“सात,” असे ते उत्तर देतात.
“अजून तुम्हाला समजत नाही काय?” येशू विचारतो. तो म्हणतोः “मी भाकरीविषयी बोललो नाही, हे तुम्ही का समजत नाही? परुशी व सदुकी ह्यांच्या खमीराविषयी सावध राहा.”
शेवटी शिष्यांना अर्थ उमगतो. वस्तु फसफसण्यासाठी व कणीक फुगविण्यासाठी वापरली जाणारी वस्तु, खमीर हा शब्द भ्रष्टता सूचित करण्यासाठी वापरला गेला होता. तेव्हा आता शिष्यांना कळते की, येशू सांकेतिक भाषा वापरत असून “परुशी व सदूकी ह्यांच्या शिकवणीविषयी” सावध राहण्याचा इशारा देत आहे. या शिकवणींमुळे भ्रष्ट करणारा परिणाम होतो. मार्क ८:१-२१; मत्तय १५:३२–१६:१२.
▪ लोकांपाशी अन्नसामग्रीच्या मोठ्या टोपल्या का आहेत?
▪ दकापलीस सोडल्यावर येशू नावेतून कोठे कोठे प्रवास करतो?
▪ येशूने खमीराबद्दल काढलेल्या उद्गारांबद्दल शिष्यांचा काय गैरसमज होतो?
▪ ‘परुशी व सदुकी यांचे खमीर’ असे म्हणण्यामागे येशूचा काय अर्थ आहे?