अध्याय १३
येशूच्या परिक्षांपासून बोध घेणे
येशूचा बाप्तिस्मा झाल्यावर लगेच देवाचा आत्मा त्याला यहूदीयातील अरण्यात नेतो. त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळी “आकाश उघडले गेले,” तेव्हा त्याला स्वर्गीय गोष्टी समजू लागतात. त्यामुळे त्याला आता खूप विचार करायचा आहे.
येशू ४० दिवस व ४० रात्री अरण्यात काढतो व या काळात तो काही खात नाही. मग, तो अतिशय भुकेला असताना, परिक्षा घेण्यासाठी त्याच्यापाशी सैतान येतो व म्हणतोः “तू देवाचा पुत्र आहेस तर त्या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर.” परंतु व्यक्तीगत इच्छा पूर्ण करण्यासाठी अद्भुत शक्तीचा वापर करणे चूक असल्याचे येशूला माहीत आहे. त्यामुळे तो त्या मोहात पडत नाही.
परंतु सैतान त्याला सोडत नाही. तो दुसरा मार्ग अवलंबतो. देवाच्या दूतांनी रक्षण करावे म्हणून तो येशूला मंदिराच्या भिंतीवरून उडी घेण्यास आव्हान करतो. अशा प्रकारचे दिखाऊ प्रदर्शन करण्याच्या मोहात येशू पडत नाही. शास्त्राच्या आधारे तो दाखवतो की, अशाप्रकारे देवाची परिक्षा घेणे चूक आहे.
तिसऱ्या परिक्षेत सैतान येशूला अद्भुत रितीने जगातली सर्व राज्ये दाखवतो व म्हणतोः “तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळे तुला देईन.” परंतु देवाशी विश्वासू राहणे पसंत करून चूक करण्याच्या मोहात पुन्हा पडण्यास येशू नकार देतो.
येशूच्या या परिक्षांपासून आपल्याला बोध घेता येतो. उदाहरणार्थ, काही लोक दावा करतात तसा, सैतान हा नुसता वाईट गुण नसून, तो खरोखरची अदृश्य व्यक्ती आहे असे त्यावरुन दिसते. येशूच्या परिक्षेवरून असेही दिसते की, जगातील सर्व राज्ये सैतानाच्या मालकीची आहेत. कारण ती त्याची नसती तर सैतानाने ती देऊ करण्यात खरी परिक्षा कशी झाली असती?
शिवाय याचा विचार कराः एका नमनासाठी, येशूला जगातील सगळी राज्ये देण्यापर्यंत, बक्षीस देण्यास तयार असल्याचे सैतानाने सांगितले. अशाच प्रकारे कदाचित ऐहिक ऐश्वर्य, सामर्थ्य व प्रगतीच्या मोह पाडणाऱ्या संधी आपल्यासमोर ठेवून आपल्याला चुकीच्या गोष्टी करण्याच्या मोहात टाकण्याचा प्रयत्न सैतान करील. कोणताही मोह असला तरी देवाशी विश्वासू राहण्याचे येशूचे उदाहरण अनुसरण्याने आपण किती सूज्ञ ठरू! मत्तय ३:१६; ४:१-११; मार्क १:१२, १३; लूक ४:१-१३.
▪ अरण्यातील ४० दिवसांच्या वास्तव्यात येशूने कोणत्या गोष्टींवर मनन केले असावे असे दिसते?
▪ सैतान येशूची कशी परिक्षा घेतो?
▪ येशूच्या परिक्षांवरुन आपण काय बोध घेऊ शकतो?